Published On : Mon, Jun 6th, 2022

आत्मनिर्भर भारत संकल्पना साकारण्यासाठी कृषी व ग्रामीण क्षेत्रात क्रांतीची गरज : ना. गडकरी

Advertisement

पुणे” : भारत देश आत्मनिर्भर व्हावा, भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था व्हावी यासाठी देशात कृषी व ग्रामीण क्षेत्राच्या विकासात क्रांती आणण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

वसंतदादा साखर इन्स्टिट्यूट येथे आयोजित राज्यस्तरीय साखर परिषद 2022 चे उद्घाटन करताना ते बोलत होते. याप्रसंगी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे ऑनलाईन उपस्थित होते. कार्यक्रमाला राष्ट्रीय नेते खा. शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, खा. श्रीनिवास पाटील, साखर आयुक्त शेखर गायकवाड, राष्ट्रीय सहकारी कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर उपस्थित होते.

Advertisement

याप्रसंगी बोलताना ना. गडकरी म्हणाले- कृषी व ग्रामीण क्षेत्र सुखी संपन्न होणार नाही, तोपर्यंत देशाची प्रगती होणार नाही. शेतकर्‍याचा विकास झाल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. या सर्व व्यवस्थेत साखर उद्योग महत्त्वाची भूमिका बजावत आहे. कारण 188 लोकसभा मतदारसंघावर ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा प्रभाव आहे. देशासमोर जी स्थिती सध्या आहे, त्याचा संबंध ग्लोबल अर्थव्यवस्थेशी आहे. जोपर्यंत ग्लोबल अर्थव्यवस्था समजली नाही तर कुठेतरी अडचणी आल्याशिवाय राहणार नाही. साखर, गहू, मका, तांदूळाचा साठा देशात मुबलक आहे. आज गरज आहे ती खाद्य तेलाची. म्हणून तेलबियांच्या उत्पादनात वाढ आवश्यक आहे. देशात आज 1.5 लाख कोटीचे खाद्य तेल आयात केले जाते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

आगामी काळात संशोधनाला खूप महत्त्व आहे, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या उपयोगाद्वारे बदल घडवून आणणे आवश्यक आहे. ज्ञानाचे आर्थिक सुबत्तेत परिवर्तन करणे गरजेचे आहे. भविष्यात देशात 25 लाख कोटी इंधन आयातीसाठी खर्च करावा लागणार आहे. त्यावर नियंत्रण आणायचे असेल तर इथेनॉल, मिथेनॉल, सीएनजी, बायो सीएनजी, बायो एलएनजी, ग्रीन हायड्रोजन यासारख्या इंधन वापराला प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे. सध्या 70 टक्के मालवाहतूक व 90 टक्के प्रवासी वाहतूक रस्त्यांवरून होते. त्यामुळे इंधनाची मागणी वाढली आहे आणि वाहनांची संख्याही वाढली आहे. देशात पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल टाकण्याचा निर्णय झाला.

त्यानुसार 1 हजार कोटी इथेनॉल लागणार आहे. तेवढे उत्पादन करण्याची क्षमता आपल्या साखर कारखान्यांमध्ये नाही. आगामी काळात ऊसाचे दर कमी करता येणार नाहीत, मात्र साखरेचे दर कमी होऊ शकतात. परिणामी साखर कारखाने अडचणीत येतील. या समस्येपासून दिलासा पाहिजे असेल तर साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती सुरु केली पाहिजे. नव्या तंत्रज्ञानामुळे इथेनॉलचे उपयोगिता मूल्य पेट्रोलएवढेच झाल्याने पेट्रोलऐवजी इथेनॉल वापरता येणार आहे. पेट्रोल किंवा इथेनॉलवर वाहन पूर्णपणे चालण्यासाठी फ्लेक्स इंजिन आपण आणत आहे. यामुळे प्रदूषण कमी होईल. पुण्यात इथेनॉलचे पंप सुरु व्हावेत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.