मुंबई : एमपीएसी परीक्षांनंतर निकाल आणि नियुक्तीत तत्परता दिसून येत नसल्याचा आरोप परीक्षार्थींकडून वारंवार करण्यात येत आहे. याविरोधात अनेकदा विद्यार्थांनी आंदोलन केले. त्यामुळेच, राज्यातील एमपीएससी संदर्भात आमदार शिवाजीराव गर्जेंकडून विधिमंडळात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत महत्त्वाची घोषणा केली आहे.
भविष्यात एमपीएससीमार्फत मोठी भरती करण्यात येणार आहे. तसेच, युपीएससी प्रमाणे एमपीएससीमध्ये देखील कॅलेंडर असेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
एमपीएससी परीक्षा या वर्षापासून आपण डिस्क्रीप्टिव्ह स्वरुपात घेणार आहोत. अर्थातच, या प्रक्रियेला काहींचा विरोध आहे, मात्र आपण हा विरोध ग्राह्य धरणार नाही, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी एमपीएससी परीक्षेसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. एमपीएससी मंडळात ज्या रिकाम्या जागा आहेत, त्यापैकी एक जागा पूर्ण करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर, उर्वरीत दोन जागांसंदर्भात आपण ॲड देतो आहोत, अशी माहितीही फडणवीस यांनी सभागृहात दिली. दरम्यान,अजित पवारांनी दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांना ह्या जागा भरण्यासंदर्भात पत्र दिले होते.एमपीएससीची सर्वच पदं लवकर भरली गेली पाहिजे हा प्रयत्न असतो. सध्या तीन पदे रिक्त आहेत, ती आपण तात्काळ भरतोय. पूर्ण रिस्ट्रकचर करत आहोत. भविष्यात मोठ्या प्रमाणात भरती प्रकिया करतोय, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली. तसेच, परिक्षेचा निकाल आला तेव्हापासून आपण वेगाने काम केले, तरी देखील मी मान्य करतो की अजुन वेगाने काम करू, असेही फडणवीस म्हणाले.
तसेच लवकरच लोकसेवा आयोगातील अभियांत्रिकी पदांसाठी होणाऱ्या परीक्षा मराठीत होणार आहेत .अभियांत्रिकी पदांच्या अभ्यासक्रमांची पुस्तकेही मराठीत उपलब्ध होणार असून इतर सर्व तांत्रिक पदांच्या स्पर्धा परीक्षा ही मराठीमध्ये घेण्याचे नियोजन असल्याचे फडणवीस म्हणाले होते.
दरम्यान MPSC मध्ये मनुष्यबळ कमी असल्याने स्पर्धा परीक्षेची सर्व प्रकिया होऊनही उमेदवारांचे पोस्टिंग होत नाही. याशिवाय पोस्टिंग देण्यासाठी काही व्यवहार होतात, असा आरोपच आमदार विक्रम काळे यांनी केला. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात उत्तर दिले.