नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पीय भाषणास सुरुवात केली आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळात भारतीय अर्थव्यवस्थेत मोठे परिवर्तन झाल्याचे पाहायला मिळाले. 2014 मध्ये जेव्हा पंतप्रधान मोदींनी सत्ता हाती घेतली, तेव्हा सरकारला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले. सरकारचे लक्ष सर्वसमावेशक विकासावर आहे आणि सर्व वर्गासाठी आणि लोकांसाठी विकासाची चर्चा आहे.
2047 पर्यंत आपण भारताला विकसित देश बनवू, असे विधान सीतारमण यांनी केले.अर्थव्यवस्थेला बळ मिळावे आणि लोकांना रोजगार मिळावा, यासाठी मोदी सरकारने अनेक योजना अंमलात आणल्या. जनतेने आम्हाला दुसऱ्यांदा सरकारमध्ये निवडून दिलं. आम्ही सर्वसमावेशक विकासाबद्दल बोललो. सर्वांचा पाठिंबा, सर्वांचा विश्वास आणि सर्वांचे प्रयत्न या मंत्रानं आम्ही पुढे जात आहोत.
प्रत्येक घरात पाणी, सर्वांना वीज, गॅस, वित्तीय सेवा आणि बँक खाती उघडण्याचं काम केले आहे. अन्नाच्या समस्या दूर केल्या आहेत. 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देण्यात आले आहे. मूलभूत गरजा पूर्ण झाल्या, त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचे उत्पन्न वाढले आहे. आम्ही लोकांना सक्षम करण्यासाठी काम करत आहोत. आम्ही भ्रष्टाचार आणि घराणेशाही संपवली आहे.