पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांचे वाहन टोलनाक्यावर रोखल्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावरील टोलनाक्याची तोडफोड केली. यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
अमित ठाकरे शिर्डीहून मुंबईला परत येत असताना सिन्नर तालुक्यातल्या टोलनाक्यावर त्यांचं वाहन अडवण्यात आले. तेव्हा टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी अमित ठाकरेंशी वाद घातला. या वादानंतर त्याच दिवशी (२३ जुलै) रात्री मनसेच्या कार्यकर्त्यांनी या टोलनाक्याची तोडफोड केली. या तोडफोडीनंतर भाजपाने मनसेवर टीका सुरू केली आहे. यावर पहिल्यांदाच राज ठाकरे यांनी भाष्य केले.
अमित सध्या महाराष्ट्रभर दौरा करतो आहे. तो काही टोलनाके फोडत चालला आहे असे काही नाही. एका टोलनाक्यावर हा प्रसंग घडला.त्या टोलनाक्यावर अमितची गाडी बराच वेळ उभी होती. त्याच्या कारवर फास्टॅगही होता. तरीदेखील त्याला थांबवून ठेवले होते. तो त्यांना सांगत होता की, मी टोल भरला आहे, तरी त्याला थांबवण्यात आले.
त्यानंतर वाद झाला आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाका फोडला. यावर भाजपने टीका करण्यापेक्षा त्यांनी निवडणुकीआधी जी टोलमुक्त महाराष्ट्राची घोषणा केली होती, त्याचे काय झाले? असा संतप्त सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. हे जे टोलनाके आहेत ते म्हैस्कर नावाच्या माणसाला मिळतात, हा कोण लाडका आहे? हा कोणाचा लाडका आहे? यावरही त्यांनी बोलावे, असेही राज ठाकरे म्हणाले.