नागपूर: राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, या मागणीने जोर धरला आहे. तर दुसरीकडे सर्व राजकीय पक्ष आणि ओबीसी संघटनांनी ओबीसीच्या कोट्यातून हे आरक्षण देऊ नये, अशी भूमिका घेतली आहे. सरकार यातून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करीत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी “मराठा समाजासाठी सध्या ओबीसीमध्ये असलेल्या कुणबी समाजानं मोठं मन करावं, असं मोठं वक्तव्य केले आहे.मिटकरी यांच्या या विधानावर नागपुरातील काही स्थानिक नेत्यांनी विरोध केला.
दरम्यान राष्ट्रीय ओबीसी महासंघाने मिटकरी यांना काही प्रश्न केले असून या प्रश्नावर अभ्यास करून बोलावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कुणबी समाजाने मोठे मन करून काय होणार? असा सवाल राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी केला.
कुठल्याही जातीला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी एक प्रक्रिया ठरली आहे. त्यामाध्यमातून जावे लागेल. मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र दिल्यावर जात प्रमाणपत्राची वैधता सिद्ध करावी लागते. त्यासाठी १९६७ पूर्वीचे पुरावे लागतात. ते कोठून आणणार? असे प्रश्न तायवाडे यांनी उपस्थित केले.