नागपूर : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून नागपुरात सुरू झाले. यापार्श्वभूमीवर 23 सप्टेंबरच्या पूरग्रस्त नागपूरकरांना भरीव भरपाईच्या स्वरूपात मोठा दिलासा मिळण्याची आशा आहे. मात्र हा मुद्दा नेमका सभागृहात उचलून धरण्यात येईल का ? राज्य सरकारकडून पूरग्रस्त नागपूरकरांना मदत जाहीर होणार का ? पूरग्रस्त नागपूरकरांच्या भरपाईचा मुद्दा स्थानिक आमदार मांडणार का ? असे प्रश्न सध्या उपस्थित करण्यात येत आहे.
नागपूरमध्ये पूर येऊन जवळपास चार महिन्याचा कालावधी उलटला आहे. मात्र अद्याप पूरग्रस्तांना मदत मिळाली नाही.
राज्याची उपराजधानी म्हणून नागपूरला ओळखले जाते. नागपूर हे केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांचे गृहघर आहे. मात्र राज्य सरकारच्या कामाच्या दृष्टीने दुर्लक्षित राहिलेले शहर म्हणून आता प्रकाशझोतात येत आहे. अनेक प्रश्न नागपुरात अजूनही अनुत्तरीतच आहेत याच प्रश्नांची उकल व्हावी की जेणेकरून नागपुरातील जनतेला उचित न्याय मिळावा या मुख्य उद्देशाने हिवाळी अधिवेशन हे नागपूर येथे आयोजित केले जाते. 23 सप्टेंबरच्या पहाटे प्रचंड पावसाने नागपुरातील अनेक भाग पुराच्या पाण्यात बुडाले होते. नाग नदीला पूर आल्याने नदीच्या दोन्ही बाजूंच्या वस्त्यांमध्ये पाणी साचले. पुरामुळे हजारो रहिवासी बाधित झाले परंतु आपत्तीचे दिवस उलटूनही प्रशासन समस्या सोडविण्यात आणि नुकसान भरपाई देण्यात अपयशी ठरल्याचे चित्र आहे. प्रशासनाकडून नागरिकांना तात्पुरती मदत करण्यात आली. मात्र त्या मदतीपेक्षा नागरिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.
मानवनिर्मित आपत्ती :
नागपुरात 23 सप्टेंबरला आलेला महापूर मानवनिर्मित होता. प्रशासन चुकीच्या पद्धतीने याला नैसर्गिक आपत्तीचा परिणाम म्हणत आहे. नागपुरात ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसानं काही काळातच अक्षरशः हाहाकार माजविला. विकासाच्या नावाने झालेली जंगलतोड, वृक्ष तोड, परिसरातील औद्योगिकरण वाढत प्रदूषण आणि शहरीकरण, काँक्रीटीकरण, ह्यातून निर्माण झालेली तापमान वाढ नाग नदीच्या काठावर झालेली अतिक्रमण, ओव्हर प्लो पॉइंट जवळील विवेकानंद स्मारक देखील तितकेच कारणीभूत आहे.
अनेकांचे संसार उघड्यावर पडले-
काही लोकांच्या घरातील अन्नधान्य वाहून गेले तर व्यापारी दुकानांचे कोट्यावधींचे नुकसान झालं. पुराचे पाणी ओसरल असलं तरी या पुराच्या जखमा अजूनही नागपूरकरांच्या मनात कायम आहे. अवघ्या 4 तासात झालेल्या 109 मिमी पावसाने शहराची दैना केली. नागरिक साखर झोपेत असताना अचानक घरात पाणी शिरले. ही बाब लक्षात येईपर्यंत घरातील बहुतांश सामान, अन्न धान्य आणि महत्वाच्या वस्तू एकतर वाहून गेलं होतं किंवा ते पाण्याच्या भक्षस्थळी आले होते. अनेकांनी रात्रीच्या काळोखात जिवाच्या आकांताने मिळेल तिथे आश्रय घेतला. काहींनी गच्चीवर चढून प्राण वाचविले तर काहींनी मिळेल तिथे आश्रय घेतला.
पूरग्रस्तांना मदतीच्या नावाने दाखविले आवश्वसनाचे ‘गाजर’ –
पुरामुळे शहरातील सुमारे दहा हजाराहून अधिक घरांमध्ये पाणी शिरल्याने जीवन उपयोगी साहित्य पुरात भिजले आहे. त्यामुळे या नागरिकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. यासोबतच शहरातील हजारो दुकानांमध्ये पाणी शिरल्याने दुकानातील साहित्य भिजल्याने हजारो व्यावसायिक संकटात सापडले आहेत. त्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले असून नुकसानीच्या तुलनेत सरकारने जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी आहे. मदत व पूनर्वसन मंत्री अनिल पाटील नागपूरला येऊन गेले. यादरम्यान अधिवेशनात पूरग्रस्त नागपूरकरांना मोठी नुकसान भरपाई जाहीर करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. त्यामुळे नागपुरातील पूरग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
हिवाळी अधिवेशनात विशेष पॅकेज जाहीर करण्याच्या आश्वासनाचे काय ?
नागपुरात आलेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांचे नुकसान पाहत राज्याचीच नाही तर केंद्राची मदत मिळण्यासाठीही प्रयत्न सुरू आहे. नागपुरातील पूरग्रस्तांसाठी नागपूर हिवाळी अधिवेशनातही विशेष पॅकेज देण्यात येणार आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनी दिली. तसेच नागरिकांचे २०० कोटींचे नुकसान झाले असेल तर ४०० कोटींची मदत देण्याची तयारी शासनाची आहे. दुपटीने मदत देऊ, असेही ते म्हणाले होते.